Umarkhed MPSC news
उमरखेड : जिद्द, चिकाटी आणि स्पष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या अथक परिश्रमांचे फळ अखेर मिळाले असून उमरखेड येथील हरीष शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन करत २५८ जागांमधून राज्यात ६३ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांची राजपत्रित कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे.
हरीष शिंदे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण साखळे विद्यालय, उमरखेड येथे झाले. त्यांनी २०१३ साली दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर वसंतराव नाईक कृषी विद्यालय, बिटरगाव येथून २०१५ साली बारावी पूर्ण केली. पुढे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरमधून २०१९ साली त्यांनी कृषी पदवी संपादन केली.
पदवीच्या शेवटच्या वर्षात प्रशिक्षण घेत असताना यवतमाळ जिल्ह्यात चुकीच्या फवारणी पद्धतीमुळे पिकांचे नुकसान होऊन अनेक शेतमजुरांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना त्यांच्या मनाला चटका लावून गेली. ग्रामपंचायतींकडे उपलब्ध असलेल्या स्प्रेईंग किटचे योग्य वाटप झाले असते, तर ही दुर्घटना टळू शकली असती, असा विचार त्यांच्या मनात घर करून गेला. “मी त्या पदावर असतो, तर हे होऊ दिले नसते,” या भावनेतूनच त्यांनी कृषी अधिकारी होण्याचा निर्धार केला. हाच त्यांच्या अभ्यासाचा खरा प्रेरणाबिंदू ठरला.
२०२२ साली पुण्यात येऊन त्यांनी MPSC च्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या चार गुणांनी अपयश आले; मात्र त्यांनी हार मानली नाही. अधिक जोमाने तयारी करत दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली. मुख्य परीक्षा १७ मे २०२५ रोजी झाली. मुख्य परीक्षेचा निकाल १० फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात हरीष ला यश मिळाले.
हरीष यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा संघर्ष व पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांचे वडील नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागातून कनिष्ठ सहाय्यक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. मित्रमंडळींची प्रगती, पालकांचा त्याग आणि शेतकऱ्यांच्या वेदनेतून मिळालेली प्रेरणा या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. हरीष यांचे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून “अपयश हे यशाची पहिली पायरी असते” याचा प्रत्यय त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.