नायगाव : नांदेड जिल्ह्यातील पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते बालाजी बच्चेवार यांनी केला आहे.
पिक विम्याच्या प्रश्नासंदर्भात बच्चेवार यांनी सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्न येत्या आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचे बच्चेवार यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी अद्याप पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीची लगबग सुरू असताना ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहनही बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
यावर्षी पिक विम्याचा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गंभीर ठरला असून, अनेकांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चेवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यास हजारो शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
"जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसांत जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये."— बालाजी बच्चेवार