नायगाव : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने नायगावसह मांजरम, बरबडा, नरसी व कुंटूर सर्कलमधील बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलविले आहे. यंदा मान्सूनने सुरुवातीलाच दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या पूर्ण केल्या; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. अखेर गेल्या तीन दिवसांतील जोरदार पावसामुळे खरीप पिकांना जिवदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा पेरण्या उशिरा झाल्यामुळे उडीद व मुगाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली असून सोयाबीनच्या लागवडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील बहुतांश खरीप क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मुग ही पिके आता जोमाने वाढू लागली आहेत. वेळेवर झालेल्या या पावसामुळे पिकांची वाढ चांगली होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मध्यंतरीच्या पावसाच्या खंडाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी निंदणी, खुरपणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे पूर्ण केली होती. मात्र पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंता वाढली होती. अखेर निसर्गाने साथ दिल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पाऊस उघडल्यानंतर तणनाशक व रोगप्रतिबंधक औषधांच्या फवारणीसह पुढील शेतीकामांसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
गुरुवारी मुसळधार सरी; जनजीवन विस्कळीत
गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. उघडझाप करणाऱ्या मुसळधार सरींनी दिवसभर तालुक्याला झोडपून काढले. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी देण्यात आली, तर कार्यालये, दुकाने आणि छोट्या व्यावसायिकांच्या कामकाजावरही परिणाम झाला.
आठवडी बाजारावर पावसाचे सावट; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
गुरुवारी भरलेल्या नायगावच्या आठवडी बाजारावरही पावसाचे सावट राहिले. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचले आणि अनेक व्यापाऱ्यांना आपला माल आवरता घ्यावा लागला. ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने व्यापारावर परिणाम झाला. भाजीपाला, फळे व किरकोळ विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे आठवडी बाजार पूर्णपणे विस्कळीत झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
भोकर तालुक्यातही संततधार सुरूच...; जनजीवन विस्कळित
भोकर : पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांच्या कालावधीत मोठा पाऊस झाला नव्हता यामुळे नदी नाले कोरडे होते. पण ३० जुलैच्या पहाटे ३ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून भोकर शहरातील आठवडी बाजारात ही शुकशुकाट दिसून आला.
या वर्षी मृग कोरडा गेला. तद्नंतर झालेल्या पावसामुळे पेरणी उरकली. पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिके माना टाकायला सुरुवात केली होती. मागील आठवड्यापासून अधूनमधून हलक्या सरी येत गेल्याने पिकांना जीवदान मिळाले. पण मागील दोन महिन्यात मोठा पाऊस झाला नसल्याने नदी नाले कोरडे होते. पण पहाटे तीन पासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. या वर्षी नदी नाले पहिल्यांदाच वाहते झाले आहेत. संततधार पावसामुळे भोकर च्या आठवडी बाजारात ही शुकशुकाट होता.