Naigaon unseasonal rain Pudhari
नांदेड

Unseasonal Rain Nanded | नायगावात अवकाळीचा तडाखा: वादळी वाऱ्याने फळबागा उद्ध्वस्त; हळदीसह पिकांचे मोठे नुकसान

आंबा, चिकू आणि चिंच या फळबागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Naigaon unseasonal rain

नायगाव : तालुक्यात सोमवारी (दि.३०) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून अनेक ठिकाणी पिके आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा, चिकू आणि चिंच या फळबागांतील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पन्न अक्षरशः वाऱ्यावर गेले आहे.

तसेच काढणीच्या टप्प्यावर असलेली हळद, ज्वारी, हरभरा आणि गहू ही पिके पावसात भिजल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विशेषतः हळद उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून शिजवून वाळत घातलेली हळद पावसात भिजल्यामुळे तिच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

नायगाव, कुंटूर, नरसी, बरबडा, मांजरम, गडगा, कोलंबी, टेंभुर्णी, रातोळी, मुगाव, कोकलेगाव, देगाव, कृष्णूर, सोमठाणा आदी गावांसह परिसरातील अनेक भागांना या अवकाळीचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात खाली पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्जबाजारीपणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली असून तातडीने पंचनामे करून भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरीत मदत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT