विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील भाजपाच्या सत्तेस सहा महिने उलटले, तरी पालकमंत्री अतुल सावे यांना एकदाही मनपामध्ये सन्मानपूर्वक आमंत्रित न करणार्या कारभार्यांनी आता भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांतील वेगवेगळ्या कामांसाठी अर्थसाहाय्याची झोळी पसरली आहे.
१५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण सोहळा आणि अन्य कार्यक्रमांकरिता सावे नांदेडमध्ये आले होते. सर्व नियोजित कार्यक्रम पार पडल्यांनतर मनपातील भाजपा पदाधिकार्यांना सोबत घेऊन खा.अशोक चव्हाण यांनी सावे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील काही नगराध्यक्षांनी भाजपा उमेदवारास मदत केली, त्यांच्या नगर परिषदांनाही निधी देण्याचा आग्रह खा.चव्हाण यांनी वरील भेटीत धरला होता.
नांदेड-वाघाळा मनपाच्या ३० वर्षांच्या इतिहासात भाजपाची सत्ता प्रथमच स्थापन झाली आहे. शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वेगवेगळी कामे आता करावी लागणार असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात यावा, अशी मागणी मनपा पदाधिकार्यांतर्फे सभागृह नेते महेश कनकदंडे यांनी पालकमंत्र्यांकडे केली; पण या पदाधिकार्यांनी प्रस्ताव स्वरूपातील निवेदन सादर केले नाही. भेटीदरम्यान मनपा अधिकार्यांपैकी कोणीही हजर नव्हते, असे सांगण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीतून निधी कशाप्रकारे दिला जाऊ शकतो, हे खा.चव्हाण यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. वरील शिष्टमंडळाशी चर्चा करताना सावे यांनी मनपाच्या उत्पन्नाचे मार्ग, सध्याची आर्थिक परिस्थिती इत्यादी बाबींची विचारणा केली; पण ठोस आश्वासन दिले नाही, असे तेथे हजर असलेल्या भाजपाच्या एका पदाधिकार्याने सांगितले.
मनपा पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचा योग्य तो सन्मान राखला आहे का, असा सवाल वरील भेटीनंतर अतुल सावे यांच्या निकटच्या वर्तुळात असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
मनपामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर महापौरांसह इतर पदाधिकार्यांनी केवळ स्थानिक नेत्याचाच उदो उदो चालवला आहे; पण पालकमंत्री या नात्याने सावे यांना मनपामध्ये एकदाही सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले नाही, असे भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मनपामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर नव्या महापौरांनी १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर करून आरंभीच्या काळात त्याचा मोठा गाजावाजा केला. पण वेगवेगळ्या प्रभागांतील नवीन कामे मनपाच्या तिजोरीतून करण्यासाठी निधीच नसल्यामुळे मोठ्या अडचणी उद्भवल्या आहेत. मनपातील भाजपाच्या पदाधिकार्यांनी आजवर पालकमंत्र्यांना जवळपास बेदखल केले. त्याची बोच त्यांच्या मनात असल्यामुळे वरील शिष्टमंडळास त्यांनी ठोस आश्वासन दिले नसावे, असा अंदाज पक्षसंघटनेत सक्रिय असलेल्या भाजपा पदाधिकार्याने वर्तविला.
काँग्रेसचे अनेक जुने नगरसेवक आता भाजपाचे नगरसेवक झाले असले, तरी या पक्षाची कार्यशैली अजून त्यांच्यात उतरलेली नाही. प्रमुख पदाधिकार्यांचा पालकमंत्र्यांशी संवाद-संपर्क नाही. त्यामुळे पहिल्या औपचारिक भेटीमध्ये मनपाच्या झोळीत मदतीचे दान पडू शकले नाही.
खा.अशोक चव्हाण एरवी प्रत्येक सार्वजनिक घडामोडींची माहिती ‘फेसबुक’च्या माध्यमातून सांगत असतात. पण १५ ऑगस्ट रोजी त्यांनी पालकमंत्र्यांची मनपा पदाधिकारी तसेच काही नगराध्यक्षांसह विश्रामगृहावर भेट घेतली, तरी या भेटीची व चर्चेची माहिती त्यांनी सार्वजनिक केली नाही. मनपाच्या प्रमुख अधिकार्यांनाही वरील भेटीची माहिती नव्हती, असे दिसून आले.