Crime News sarpanch Election
नांदेड: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा एक धक्कादायक प्रत्यय समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवता यावी, यासाठी एका बापाने आपल्या ६ वर्षांच्या मुलीला तेलंगणामध्ये नेऊन कालव्यात बुडवून मारले.
निवडणुकीत 'दोन अपत्य' नियमामुळे आपण अपात्र ठरू, या भीतीने क्रूर बापाने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी बाप आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यमान सरपंचाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुळ गावचा रहिवासी आहे. त्याचे गावात सलूनचे दुकान आहे. त्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले होती. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची त्याला निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास स्थानिक निवडणुका लढवण्यास बंदी आहे.
आपल्याकडे तीन मुले असल्याने आपण निवडणूक लढवू शकणार नाही, आपण अपात्र ठरणार म्हणून आरोपी बापाने यातून पळवाट शोधण्यास सुरुवात केली. गावातील विद्यमान सरपंचाने त्याला 'एक मूल कोणाला तरी दत्तक दे' असा सल्ला दिला होता. त्यानंतर आरोपीने मुलाच्या जन्मतारखेच्या दाखल्यात बदल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेपर्यंत चकरा मारल्या, पण तिथे त्याचे काम झाले नाही. अखेर, एका मुलाचा काटा काढल्यास आपण तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरू, असा क्रूर विचार करून त्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा कट रचला.
२९ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या मुलीला दुचाकीवर बसवून गावापासून सुमारे ९० किलोमीटर दूर तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात नेले. तिथे एका निर्जन ठिकाणी असलेल्या कालव्यात त्याने मुलीला ढकलून दिले. काही दिवसांनंतर स्थानिकांना कालव्यात मुलीचा मृतदेह आढळला, त्यांनी पोलिसांना कळवले.
निझामाबादचे पोलीस आयुक्त पी. साई चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली होती. मुलीचा फोटो व्हायरल केल्यानंतर मुखेडच्या काही नागरिकांनी तिची ओळख पटवली. पोलिसांनी केरुळ गावात जाऊन चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला आणि त्याला चुकीचा सल्ला देणाऱ्या सरपंचाला अटक केली आहे.