पूरपरिस्‍थितीमुळे अनेक ठिकांणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. Pudhari Photo
नांदेड

Nanded Heavy Rainfall | किनवटमधील तीन वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले ; नागरिकांचे स्थलांतर

ईसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Flood water enters three settlements in Kinwat; residents evacuated

किनवट : तालुक्यातील काल शुक्रवारी रात्रीपासून तर किनवट शहरात आज पहाटे पाच पासून मुसळधार पावसास सुरूवात झाली आहे. ईसापूर धरणाचे पाच दरवाजे नेमके आजच सकाळी उघडण्यात आल्यामुळे, पैनगंगा दुथडी भरून वहात असून, खरबी पुलाच्या लागून पाणी जात आहे. परिणामी, पैनगंगा व शहराच्या उत्तरेकडील नाल्यांनाही पूर येऊन पाणी तटावरील शेतात व शहराच्या काही भागात पाणी शिरले आहे. शनिवारी (दि. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या गत 24 तासांत संपूर्ण तालुक्यातील नऊ महसूल मंडळात मिळून एकूण 229.4 मि.मी. पाऊस पडला असून, त्याची सरासरी 25.50 मि.मी. येते.

शनिवारी पहाटे तीन पासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे, धरणाच्या वरील बाजूच्या जयपूर बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्याबाजूने येणारा येवा लक्षात घेऊन ईसापूर धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सकाळी नऊ वाजता धरणाच्या सांडव्याची तीन वक्र द्वारे आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता अजून दोन गेट अशी एकूण पाच वक्रद्वारे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आली. सद्यस्थितीत पैनगंगा नदीपात्रात 4,988 क्यूसेक्स (141.229 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ईसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.

रिकामी स्‍कूल व्हॅन वाहून गेली चालक बेपत्ता
महसूल व पालिका प्रशासनाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी पूराचे पाणी व पूरपिडित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात गुंतले असल्यामुळे, तालुक्यात पाऊस व पुरामुळे झालेली जीवित व वित्त हानीबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र,बोधडी नाल्यातील एका पुलावरून जाणाऱ्या पाण्यात एक रिकामी स्कूल व्हॅन चालकाने घातल्यामुळे वेगवान प्रवाहामुळे ती ‘व्हॅन’ वाहून गेली. प्रेमसिंग मोहन पवार (वय 35 वर्षे) रा.सिंदगी असे त्या ड्रायव्हरचे नाव असून, त्याचा शोध सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील मोमीनपुरा, नालागड्डा, गंगानगरचा मागील भाग व बेल्लोरी नाल्याच्या काठावरील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महसूल व पालिका प्रशासनाकडून पूरग्रस्तांना उर्दुशाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. पैनगंगा व नदी,नाल्याकाठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे खरीप पिकांची अतोनात हानी झालेली असून, पिके चिबडणे,सडणे वा रोगट होण्याची शक्यता वाढलेली आहे.

शनिवारी सकाळी घेतलेली किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 24.0(552.8 मि.मी.); बोधडी- 35.5(713.7 मि.मी.); इस्लापूर- 34.0 (620.3 मि.मी.); जलधारा- 42.0 (629.4 मि.मी.); शिवणी- 30.8 (851.7 मि.मी.); मांडवी- 5.0 (579.6 मि.मी.); दहेली- 6.5 (585.0 मि.मी.), सिंदगी मो. 35.3 (611.7 मि.मी.); उमरी बाजार 16.3 (583.1 मि.मी.).

किनवट तालुक्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यातील पावसाची सरासरी 1026.58 मि.मी.आहे. त्यातुलनेत आजपर्यंत प्रत्यक्षात 636.50 मि.मी. पाऊस पडलेला असून, त्याची टक्केवारी 62 आहे. एक जून ते आज पर्यंत पडणारा सरासरी पाऊस 638.60 मि.मी. असून, आतापर्यंत त्याच्या तुलनेत 99.67 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की, समाधानकारक आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस बोधडी मंडळात झाला असून, सर्वात कमी किनवट मंडळात झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT