मुखेड : अल नेनो च्या प्रभावामुळे वेळेवर पाऊस न पडल्याने ह्या हंगामात पेरण्या होतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान मध्यंतरी पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतक-यानी पेरण्या केल्या. पण, पेरण्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने उगवलेले बियाणे सुकुन जाण्याच्या अवस्थेत असताना दुबार पेरणीसदृष्यस्थिती निर्माण झाली होती. मागील 3 दिवसात दमदार हजेरी लावल्याने सर्व पिकांना जिवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे.
उशिरा पेरण्या झाल्याने उडीद मुग या पिकाना फटका बसला असुन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. मुखेड तालुक्यात 75000 हेक्टर पैकी 73050 हजार खरीप क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. 52600 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 8700 हेक्टर वर कापुस, 7800 हेक्टरवर तुर, 2050 हेक्टरवर उडीद व 1900 हेक्टर वर मुग पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात पावसाची प्रतिक्षा करत शेतक-यांनी निंदन, खुरपण धुडी, कोळपे मारणे ही कामे उरकुन घेत पावसाची प्रतिक्षा केली.
अखेर मागील 3 दिवसात तालुक्यात सर्वदुर पावसाने दमदार हाजेरी लावल्याने पिकाना जिवदान मिळाल्याबद्दल शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. पाऊस थांबल्यानंतर करावयाच्या शेती कामासाठी शेतकरी सज्ज असुन तणनाशक, रोग प्रतिबंधक औषधाच्या फवारणीची तयारी केली जात आहे. मुखेड तालुक्यातील जमीन हलक्या व मध्यम प्रतिची असुन मागील 3 दिवसांपासून व पुढे 2 दिवस पाऊस पडला तरी शेतीपिकावर फारसा फरक पडणार नसल्याचे तालुका कृषी अधिकारी गोदमगावकर यांनी स्पष्ट केले आहे.