किनवट : तालुक्यातील चिखली गोखुळ नगर येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सुरुवातीला या दोघींचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बालिकांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष व्यक्त केल्याने घटनेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सई दिलीप मुंगल (वय ४) हिचा ८ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर तिची मोठी बहीण श्रुष्टी दिलीप मुंगल (वय ६) हिने ९ मे रोजी रात्री आदिलाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे मुंगल कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप मुंगल हे कुटुंबासह शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन्ही चिमुकल्या शेत परिसरात फुले तोडत होत्या. यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
सुरुवातीला सर्पदंशाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांनी दोन्ही बालिकांना सर्पदंश झाल्याचे आढळून आले नसून, दुषित अन्नामुळे विषबाधा झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले. दरम्यान, याच दिवशी आंदबोरी येथील एका शेतकऱ्याचा नागाच्या दंशामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
सर्पदंशानंतर संबंधित शेतकऱ्यावर गावातच खाजगी उपचार करण्यात आले. सुमारे तासाभराने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहितीही डॉ. केंद्रे यांनी दिली. सर्पदंश झाल्यास विलंब नको : डॉ. केंद्रेसर्पदंश झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे झाडफुंक किंवा खाजगी उपचार करण्याऐवजी रुग्णाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक आहे.
वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरील आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांनी दिली.