संघपाल वाघमारे
कंधार : शहरात नगरपालिका अंतर्गत वॉर्ड नंबर 7 मध्ये सुलभ शौचालय उभारण्यात आले होते. सुरुवातीच्या काळामध्ये प्रशस्त रंगरंगोटी करून चकाचक शौचालय दिमाखात उभे होते. परंतु काही दिवसांपासून याच शौचालयाची एवढी दुरवस्था झाली आहे की, त्या ठिकाणाहून ये - जा करणाऱ्या लोकांसाठी अक्षरशः नाकाला हात धरून जाण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे. त्यामुळे नगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण सध्या तरी कागदावरच झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासन व राज्य सरकार स्वच्छता मोहिमेसाठी देशभरामध्ये हजारो कोटी रुपये ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यासाठी दरवर्षी या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जाते. परंतु त्या निधीचा योग्य उपयोग होतो की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र कंधार नगरपालिकेकडून या योजनेला हरताळ फासला की काय? अशी अवस्था येथील स्वच्छतागृहाची झाली आहे.
प्रशासनाची जबाबदारी असलेल्या स्वच्छता गृहाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने अतिशय गलिच्छ, दुर्गंधीयुक्त स्थिती असल्याने याकडे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण सध्या तरी कागदावर झाल्याचे दिसून येत आहे.
कंधार शहरांमध्ये नगरपालिका अंतर्गत ही स्वच्छतागृह येत असल्यामुळे नगरपालिकेची कोणती यंत्रणा त्या स्वच्छतागृहामध्ये साफसफाईसाठी येत नसल्याचे दिसून आले. त्या स्वच्छतागृहाची दारे तुटलेली आहेत. स्वच्छतागृहामध्ये पाण्याच्या बाटल्या, पॉलिथिन कव्हर, दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या पडल्याने स्वच्छतागृहाची सीट पूर्णपणे तुंबलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेने हे सुलभ शौचालय दुरुस्ती करून द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून केली जत आहे.