नायगाव : नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ४ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा परिषद कार्यालय, नांदेड येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला सहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लालवंडी येथील पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकारांबाबत यापूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ठेकेदाराने प्रत्यक्षात अपूर्ण व कमी दर्जाचे काम करूनही संपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. काही ठिकाणी सीसी रस्ते तोडण्यात आले असून पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच अंदाजपत्रकानुसार विहिरीचे खोदकाम व अन्य कामे न करता मोजमाप वाढवून एम.बी. नोंदी केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराकडून देयकांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच चौकशी अहवाल लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले असून, सोमवारपर्यंत उपोषणाचा सहावा दिवस असल्याची माहिती अर्जदार राजेश गंगाधर जोंधळे (रा. लालवंडी, ता. नायगाव) यांनी दिली.
या प्रकरणामुळे जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिलगुंडे, पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश केरुरे यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.