बाळासाहेब पांडे
नायगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल संघर्षाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर बसत आहे. कृत्रिम इंधन टंचाई, वाहतुकीतील अडथळे आणि व्यापाऱ्यांची माघार यामुळे शेतमालाच्या खरेदी-विक्रीची साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक अक्षरशः शेतातच नाश पावत असल्याचे हृदयद्रावक चित्र समोर येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगाव येथे ही परिस्थिती अधिक तीव्रतेने जाणवत आहे. येथील शेतकरी बळवंत बेंद्रे यांनी चार एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली होती. भरघोस उत्पादनाची अपेक्षा असतानाच अचानक निर्माण झालेल्या वाहतुकीच्या अडचणींमुळे एकही व्यापारी शेतात पोहोचला नाही. परिणामी, हजारो क्विंटल कलिंगड शेतातच सडून गेले असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टाचे मोल शून्य ठरले आहे.
याच दरम्यान, निसर्गानेही साथ सोडल्याने संकट अधिक गडद झाले. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बेंद्रे यांच्या मिरचीच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. आधीच बाजारपेठेअभावी कलिंगडाचे नुकसान झाले असताना, मिरचीच्या पिकाचे झालेले नुकसान म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुहेरी आघात ठरला आहे.
अस्मानी-सुलतानी संकटाचा विळखा
इराण-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई आणि वाहतुकीची अडचण ही ‘सुलतानी’ संकटे ठरत असताना, वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ‘अस्मानी’ संकटही कोसळले आहे. या दुहेरी फटक्यामुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
व्यापाऱ्यांची माघार; शेतकरी हवालदिल
इंधन दरवाढ आणि अनिश्चिततेमुळे व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतमाल खरेदी करण्यास स्पष्टपणे हात आखडता घेतला आहे. परिणामी, बाजारपेठेचा अभाव निर्माण होऊन शेतमाल शेतातच पडून राहत आहे. यामुळे उत्पादन खर्चही वसूल न होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांकडून शासनाकडे तातडीने आर्थिक मदत, नुकसान भरपाई आणि वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे. अन्यथा, आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"चार एकरात कलिंगड लावलं होतं, पण एकही व्यापारी आला नाही. सगळं पीक शेतातच सडून गेलं. त्यातच वाऱ्यामुळे मिरचीचंही नुकसान झालं. आता आम्ही काय करावं, असा प्रश्न पडला आहे. सरकारने मदत करावी, हीच अपेक्षा आहे."बळवंत बेंद्रे (कलिंगड उत्पादक शेतकरी)
‘जागतिक संघर्ष, स्थानिक शोकांतिका’
इराण-इस्त्रायल युद्धासारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम थेट ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांवर होत असल्याचे हे व उदाहरण चिंताजनक आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडत असल्याचे वास्तव या घटनेतून अधोरेखित झाले आहे.