Guardian Minister Shivendrasinh Raje Bhosale inspected the damage to agricultural crops on the banks of the Tiru River in Tiruka, Jalkot taluka.
उदगीर/चाकूर/जळकोट, पुढारी वृत्तसेवाः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जावू नये. या अस्मानी संकटाच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जळकोट तालुक्यातील तिरुका येथे पालकमंत्री श्री. भोसले यांनी तिरु नदी काठावरील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेत त्यांना दिलासा दिला. यावेळी आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता वी. एम. थोरात, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटचे तहसीलदार राजेंद्र लांडगे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती रामचंद्र तिरुके, श्याम डावळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची जिल्ह्यासाठी प्राप्त झालेली २४४ कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून एकही शेतकरी वंचित रा-हणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
पीक विमा भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे अहवाल महत्वाचे असल्याने कृषी विभागाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. पुरामुळे वाहून गेलेल्या रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंधारे, बॅरेज, तलावांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. तातडीने करणे आवश्यक असलेली कामे आणि दीर्घकालीन उपाययोजना या दोन टप्प्यात कामे होणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
चाकूर तालुक्यातील मुरंबी ते म्हाळग्रावाडी मार्गावरील पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाची, तसेच देवंग्रा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, सुरज बाबासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.