Government's neglect of the work of 'Magra Rohayo'
महेंद्र देशमुख
नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची नांदेड जिल्हा परिषदेने मोठी कामे केली; परंतु शासनाने जिल्हा परिषदेला निधी देण्यास टाळाटाळ केल्याने २०२१ ते २०२६ या कालावधीतील जिल्ह्याचे २०७ कोटी २९ लक्ष रुपये शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली.
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री पांदण रस्ते योजना, सिंचन विहीर, जनावरांचे गोठे, शेततळे, घरकुले यासह विविध कामे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यात ४५ हजार घरकुले या योजनेतून उभारली जात आहेत. चालू आर्थिक वर्षात सन २०२५-२६मध्ये ७६ हजार कामे अपूर्ण होती.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याबाबत सतत पाठपुरावा करून मागील एक महिन्यात ९ हजार ५११ कामे पूर्ण करून घेतली. विशेष म्हणजे आजघडीला चालू वर्षातील मातोश्री पाणंद रस्त्याचे १६ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे. मागील अनेक वर्षांपासून निधी न मिळाल्यामुळे ८० हजारांच्या जवळपास कामे अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
निधीसाठी पाठपुरावा चालू!
जिल्हा परिषद नांदेड नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बहुतांश कामे सुरू आहेत. काही कामे निधीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक घरकुलांचा समावेश आहे. शासनाकडे थकलेला निधी दिगा मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असल्याचे संबंधित विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी सांगितले.