CCI should increase cotton purchase limit Farmers' demand
डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : सध्या 'सीसीआय 'मार्फत कापूस खरेदी सुरू असून जिल्ह्यात चार क्विंटल ८० किलोची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीची बाब बनली असल्याने मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकरी सातत्याने करीत आहेत.
कृषी विभागाने या हंगामात कापसाची उत्पादकता ही प्रति एकरी ४. ८० क्विंटल ग्राह्य धरून पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार 'सीसीआय'ने हंगामात प्रति हेक्टरी ९ क्विंटल ६० किलो ग्राह्य धरून कापूस खरेदीची मर्यादा जाहीर केली. परंतु, जिल्ह्यात मुख्यत्वे कापूस उत्पादन केले जाते. जिल्ह्यातील शेतकरी प्रति हेक्टरी सरासरी २० ते २५ क्लिंटलपर्यंत कापसाचे उत्पादन घेतात.
त्यामुळे 'सीसीआय'ने खरेदीसाठी चार क्विंटल ८० किलोची प्रति एकर घालून दिलेली मर्यादा कमी आहे. त्यामुळे अधिक उत्पादित कापसाची विक्री खुल्या बाजारात करण्याची तसेच त्याला कमी दर मिळण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात शासनाचे हमीभाव केंद्र खरेदी करण्यात आले आहे. हभीभाव केंद्र व खुल्या बाजारात कापसाच्या किंमतीत जवळपास १ हजार ८५ रुपयांचा क्विंटलमागे फरक जाणवत आहे. हमीभाव केंद्रावर चाळीस आर क्षेत्रफळावरील चार किंटल ८० किलोची मर्यादा वाढवून १३ क्विंटलपर्यंत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शासनाला हमीभाव केंद्रावर कापूस खरेदी करायची नाही का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हमीभाव केंद्रावर पंधरा क्विंटलची खरेदी करण्यात यावी. सध्या लावलेली अट रद्द करून खरेदी वाढवावी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.विजय भवर, शेतकरी
शासनाने कापूस हमीभाव केंद्र सुरू केले. मात्र त्या केंद्रावर कापूस खरेदी कापसाची आणेवारी कमी करून चार क्विंटल ८० किलो ठेवली आहे. हि अट रद्द करून ती मर्यादा वाढवावी. केंद्रावर सरासरी बारा ते पंधरा किंटल इतका खरेदी करण्यात यावा.बाळू अंभोरे, शेतकरी
शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली सीसीआय खरेदी केंद्रावरील अटीमुळे शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुना जीआर लावून पंधरा क्लिंटल खरेदी करावे. शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, कापूस वेचणीचा खर्च, बी बियाणे रासायनिक खते, शेणखते आदीचा खर्च आहे. शेतीमाल विक्री करण्याच्या वेळी डथळा निर्माण का होतो.साजेद शेख, शेतकरी