किनवट : दयाळ धानोरा येथे मंगळवार (दि.10) च्या मध्यरात्री चिडलेल्या मादी अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चंद्रसिंग शेषराव राठोड (वय 34) यांचा सोमवारी (दि.15) सकाळी सुमारे 10.30 वाजता औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
मंगळवारी (दि.10 फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या नऊ शेतकऱ्यांवर मादी अस्वलाने अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दत्ता बळीराम जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. त्यापैकी चार जण गंभीर जखमी होते.
चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आज सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
मयत राठोड यांच्या पश्चात पत्नी, बारा व आठ वर्षांचे दोन लहान मुलगे, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाने राबविलेल्या शोधमोहिमेत संबंधित मादी अस्वलाला पकडण्यात यश आले होते. मृत व जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात आली आहे.