

नायगाव : अस्थिव्यंग व नेत्रदिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी होऊनही गेल्या वर्षभरापासून यूडीआयडी (दिव्यांग) प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी नायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रलंबित प्रमाणपत्रे तत्काळ वितरित करावीत, अन्यथा कार्यालयाबाहेर संपूर्ण व्यवस्था उखडून टाकू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा नेते गजानन पाटील चव्हाण यांनी दिला.
अस्थिव्यंग व नेत्रदिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण होऊनही त्यांना यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने शासकीय योजना, सवलती व विविध लाभांपासून ते वंचित राहत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना (नांदेड) शाखा नायगाव, धर्माबाद व बिलोली तालुक्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी गजानन चव्हाण यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत होत असलेली टाळाटाळ खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित विभागाने प्रलंबित अर्जांची तातडीने पूर्तता करून दिव्यांगांना प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ सागविकर, जिल्हा सचिव मारोती मगरुळे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेश बेळगे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कागडे, कर्णबधिर जिल्हाध्यक्ष जयवंत पवार, मुदखेड तालुका अध्यक्ष अनिल शेटे, प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली तालुका अध्यक्ष शंकर आचेवाड, नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, बिलोली तालुका अध्यक्ष हणमंत सीताफुले, महिला तालुका अध्यक्षा शांताबाई चितले, तालुका उपाध्यक्ष माधव कोसबे यांच्यासह अनेक पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन प्रलंबित यूडीआयडी प्रमाणपत्रांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून करण्यात आली आहे.