हिमायतनगर : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांबरोबरच हळदीच्या लागवडीला मोठे प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांत हळदीला मिळालेला तुलनेने चांगला बाजारभाव आणि भविष्यातील उत्पन्नाची अपेक्षा लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळदीच्या लागवडीचे क्षेत्र वाढविले आहे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड पूर्ण केली असून पीक जोमाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हळद हे पाणी आवश्यक असलेले पीक असल्याने वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यामुळे विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध सिंचन साधनांच्या माध्यमातून हळदीच्या शेतांना पाणी देण्याचे नियोजन अनेक शेतकरी करत आहेत.
"वीजपुरवठा आणि पाण्याची उपलब्धता यावरही या पिकाचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा हळदीच्या पिकाकडून चांगल्या उत्पादनाची आणि समाधानकारक दराची अपेक्षा आहे; मात्र पावसाने आणखी उशीर केल्यास सिंचनावरचा खर्च वाढून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात," अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पावसाची उघडीप कायम राहिल्यास हळदीच्या पिकाला आवश्यकतेनुसार हलके सिंचन करणे, शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आणि रोग-किडीवर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.याकरीता शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन संच आतरून ठेवत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. हिमायतनगर तालुक्यात दरवर्षी पेक्षा यावर्षी हळदीच्या पिकाची लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केले असुन निसर्गाच्या अवकृपेमुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.