Kolhapur News | कोल्हापूर-सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पाणी उपसाबंदी शिथिल

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश
Kolhapur Water Lifting Ban Relaxed
Kolhapur Water Lifting Ban Relaxed AI photo
Published on
Updated on

Kolhapur Sangli Water Lifting Ban Relaxed

कोल्हापूर : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी उपसाबंदी शासनाने तात्पुरती शिथिल केली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपसा करण्याची परवानगी मिळणार असून या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्धा जून महिना सरला तरी पावसाने दडी मारल्याने आणि उपलब्ध जलसाठ्यातून पाणी उपसा करण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने अनेक भागांतील पिके पाण्याअभावी करपू लागली होती. ऊस, भाजीपाला, फळबागा तसेच इतर नगदी पिकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपसाबंदी उठविण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते.

Kolhapur Water Lifting Ban Relaxed
Kolhapur News: शिरोळमध्ये उपसा बंदीवरून शेतकरी आक्रमक; लोकप्रतिनिधी गेले कुठे? मोठ्या आंदोलनाची तयारी!

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळाला. खासदार धैर्यशील माने आणि आमदार अमल महाडिक यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू ठामपणे मांडली.

याचबरोबर आमदार अमल महाडिक यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शेतकऱ्यांची परिस्थिती सविस्तर सांगितली. पिके धोक्यात आली असून तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शासनस्तरावर सकारात्मक हालचाली होऊन उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Kolhapur Water Lifting Ban Relaxed
Kolhapur news | नोटाबंदीनंतर २५ कोटींच्या नोटा 10 वर्षे जिल्हा बँकेत धूळ खात

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला होता. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे आणि पिके वाचविण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती.

उपसाबंदी शिथिल झाल्याची माहिती समोर येताच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तीन दिवस मिळालेल्या या संधीचा उपयोग करून पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत.

मात्र, ही शिथिलता तात्पुरती असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन आणि शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news