नांदेड : पती-पत्नीचे नाते असे असते की, आयुष्यातील जाेडीदाराने साथ साेडली की, जीवन जगणे कठीण होऊन बसते. वृध्दापकाळात तर दाेघांना एकमेकांची गरज अधिकच असते. मात्र दीड वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर एका 22 नातवंडे असलेल्या 82 वर्षीय आजाेबाने दुसऱ्यांदा एकदा लग्न केले आहे.
ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील. विशेष म्हणजे त्यांना तीन मुले, तीन सुना, तीन मुली, तीन जावई आणि चक्क 22 नातवंडे आहेत. मुलांच्या संमतीने आजोबांनी 56 वर्षीय महिलेसोबत विवाह केला आहे. चौधरी शेख हुसेन शेख अहमद, असे विवाह केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, चौधरी शेख हुसेन शेख अहमद हे मूळचे माहूर तालुक्यातील रहिवासी असून, धर्माबाद तालुक्यात उर्दू माध्यमाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. 22 वर्षांपूर्वी शेख हुसेन चौधरी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा खादरबी हुसेन साहेब यांच्या सोबत पहिला विवाह झाला होता. त्यांना तीन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि तब्बल 22 नातवंडे आहेत. त्यापैकी काही नातवांचे लग्नही झालेली आहेत.
दरम्यान, त्यांच्या पत्नीचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले होते. ते मुले आणि सुनांबरोबर राहत असले तरी मनात एकटेपणाची जाणीव सलत होती. तेव्हा त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलांसमोर त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली, सुरुवातीला या मुलांनी वडिलांच्या लग्नाला विरोध केला, पण वडिलांच्या आनंदासाठी कुटुंबीयांनी अखेर सहमती दर्शवली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी तेलंगणा राज्यातील भैंसा येथील अमिनाबेगम अहमद हुसेन यांच्याशी त्यांनी विवाह केला.
रूढी परंपरेमध्ये न गुरफटता, उतरत्या वयातही वडिलांच्या मागणीचा आणि त्यांच्या जाेडीदाराचा सन्मान करण्याचा निर्णय चाैधरी यांच्या कुटुंबीयांनी घेतला. हा समाजासाठी माेठा आदर्शच म्हणावा लागेल.
कुटुंबाचा पाठिंबा...
वय झाले की, मुले, नातवंडे दुर्लक्ष करतात. त्यांना फारसे कुणीही चांगली वागणूक देत नाही. त्यातच पत्नीचे निधन झाल्याने एकटे पडलेल्या वडिलांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनीही त्यांच्या आनंदासाठी त्यांना साथ दिली. तसेच मित्रमंडळींनी ही चौधरी यांना यासाठी प्राेत्साहन दिले. कुटुंबीय आणि मित्रमंडळीच्या पाठिंब्यामुळे आज चाैधरी हुसेन यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
अमिना माझ्यासाठी माेठी ताकद आहे...
माणसाला आयुष्यभर जोडीदाराच्या सोबतीची गरज असते. उर्वरित आयुष्य आनंदात आणि समाधानाने घालवायचे आहे. कुटुंबीय आहेत, पण साथीदार हा साथीदारच असतो. आता पत्नी अमिना ही माझ्यासाठी मोठी ताकद असेल. माझ्यानंतर माझी पेन्शन घेईल व माझ्या नावाने जगेल, अशी भावना चौधरी हुसेन यांनी व्यक्त केले आहे.