Nanded news 
नांदेड

Nanded news | दिल्लीतील जनजाती गर्जना रॅलीसाठी किनवटमधून १५०० आदिवासी प्रतिनिधी रवाना

आर्थिक प्रलोभनांच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

किनवट : जनजाती समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी, सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर देशव्यापी जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि.२४) दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला मैदानावर आयोजित ‘जनजाती संस्कार समागम गर्जना रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी किनवट तालुक्यातून सुमारे १५०० आदिवासी प्रतिनिधी दिल्लीकडे रवाना झाले. या राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनात किनवटमधून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला आहे.

जनजाती सुरक्षा मंच आणि देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विविध जनजाती संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत असून, आरक्षण हक्क, सांस्कृतिक ओळख आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रित भूमिका मांडण्यात येणार आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, जिल्हाध्यक्ष तुकाराम पेंदोर, जिल्हा सचिव विश्वनाथ नखाते आणि प्रांत सदस्य प्रकाश टारपे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भातील डिलिस्टिंग हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा असून, धर्मांतरानंतर मूळ आदिवासी परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा त्याग करणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या लाभातून वगळण्याची मागणी करण्यात येत आहे. आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ही चळवळ उभारण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्गम व आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य सेवा आणि आर्थिक प्रलोभनांच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांतील जनजाती संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. किनवटमधून रवाना झालेला प्रतिनिधींचा जथा राष्ट्रीय स्तरावरील या आंदोलनात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी संयोजक डॉ. विशाल वळवी, सहसंयोजक मौल्या गावित, प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, जिल्हाध्यक्ष तुकाराम पेंदोर, जिल्हा सचिव विश्वनाथ नखाते, प्रांत सदस्य प्रकाश टारपे, भारत हातमोडे, रामकिशन टारपे, अर्चनाताई बेडारे, सयाजी जाधव, भाग्यश्री मेश्राम, एकनाथ किनाके, कामिनाताई कोवे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT