

रायगड ः जयंत धुळप
यंदाचा जागतिक जैवविविधता दिन केवळ एक औपचारिकता न ठरता, कोकणच्या सह्याद्री कड्यांपासून ते अरबी समुद्राच्या लाटांपर्यंत पसरलेल्या या अथांग निसर्गठेव्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शपथ घेण्याची वेळ आता आली आहे.यंदाची थीम ‘बी पार्ट ऑफ द प्लॅन‘ अशी आहे. आपल्याला केवळ मूकदर्शक न राहता कृती आराखड्याचा भाग बनण्याचे अपेक्षा ज्येष्ठ वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञमाजी प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दैनिक पुढारी शी बोलताना व्यक्त केली आहे.
रायगडपासून ते पार सिंधुदुर्गापर्यंत पसरलेली किनारपट्टी आणि त्याला समांतर असणारी सह्याद्रीची पर्वतरांग अर्थात पश्चिम घाट हे जागतिक पातळीवरील प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र मानले जाते. मात्र, वाढते औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि हवामान बदल यामुळे या जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. आजच्या जागतिक जैवविविधता दिनी प्रत्येकाने सजग होवून निसर्गाप्रती संवेदनशील होणे गरजेचे आहे.
रायगडमधील फणसाड वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेचे एक उत्तम उदाहरण आहे. नुकत्याच पार पडलेल्या बुद्ध पौर्णिमा प्राणी गणनेदरम्यान आणि पक्षी निरीक्षणादरम्यान येथे बिबट्या, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, सांबर, भेकर यांसह अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. कोकणातील सुमारे 1000 पारंपरिक देवराया या वनस्पती आणि औषधी वनस्पतींच्या शेकडो प्रजातींचे नैसर्गिक बँक आहेत. आधुनिक काळात या पवित्र वनांचे म्हणजेच देवरायांचे जतन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे डॉ.पाटील म्हणाले.
जैवविविधता संवर्धनाकरिता उपाययोजना सांगताना डॉ.पाटील म्हणाले, स्थानिक सहभाग वाढवणे जैवविविधता व्यवस्थापन समित्या प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर अधिक सक्रिय करून स्थानिक वनस्पती व प्राण्यांची नोंदणी तातडीने अद्ययावत करणे आवश्यक आहे.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांकडून समुद्रकिनारे आणि जंगलांमध्ये प्लास्टिक कचरा होणार नाही आणि निसर्गाला हानी पोहोचणार नाही, यासाठी इको-टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले पाहिजे. कोकणातील शेतकरी आणि मच्छीमारांचे निसर्गाविषयीचे पारंपरिक ज्ञान वापरावे.
सागरी आणि किनारी जैवविविधता
ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर, विशेषतः रायगडमधील हरिहरेश्वर, दिवेआगार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर होणारे ऑलिव्ह रिडले कासवांचे विणीचे हंगाम हे किनारपट्टीच्या समृद्धतेचे मुख्य लक्षण आहे. यंदाच्या थिमचा विचार करता, संवर्धनाच्या या योजनेत स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभाग एकत्र येऊन अंडी घालण्यापासून ते पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात जाईपर्यंत मोठे योगदान देत आहेत. कांदळवन (मॅन्ग्रोव्हज) संरक्षण कोकणातील खाड्या आणि किनाऱ्यांवरील कांदळवने म्हणजे सागरी जीवांचे जणू पाळणाघरच ठरत आहेत. खेकडे, विविध प्रकारचे मासे आणि पाणपक्ष्यांचा हा मुख्य आसरा असून त्सुनामी व चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ही कांदळवने किनारपट्टीसाठी बायोलॉजिकल वॉल म्हणून अत्यंत प्रभावी काम करतात, असल्याचे डॉ.अनिल पाटील यांनी सांगीतले.
जैवविविधतेसमोरील आव्हाने
कोकणाच्या जैवविविधतेसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पायाभूत सुविधा आणि विकास मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण, नवीन रेल्वे मार्ग आणि कोस्टल रोड यांसारख्या विकासकामांमुळे अनेकदा हरितपट्टे आणि वन्यजीवांचे कॉरिडॉर्स बाधित होतात. त्यामुळे विकास साधताना जैवविविधतेचा समतोल राखणारा ग्रीन प्लॅन अंमलात आणणे गरजेचे बनले आहे. अलिकडच्या वर्षांत कोकणात वाढलेले अवकाळी पाऊस, चक्रीवादळे आणि उन्हाळ्यातील तीव्र उष्णता याचा थेट आणि विपरित परिणाम स्थानिक शेती, विशेषतः हापूस आंबा व काजू उत्पादनावर आणि सागरी जीवांवर होत आहे.