सेनगाव : मागील पाच दिवसांपासून तालुक्यातील ताकतोडा येथे काही शेतकर्यांनी शेतकर्यांचे पिककर्ज माफ करावे यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा गुरूवारी चौथा दिवस आहे. राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्याने सकाळी ११ च्या सुमारास आपली दुचाकी जाळून शासनाचा निषेध नोंदविला. आता तरी शासन दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
ताकतोडा येथील शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांतीराम सावके, के. के. सावके यांच्यासह शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्यावा, वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून वनविभागामार्फत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
यादिवसापासून पिककर्ज माफी आंदोलन
या मागणीसाठी २४ जूनपासून उपोषण सुरु केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ करावे, तसेच पेरणीसाठी नव्याने पिककर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पिकविमा द्यावा, या मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते.
सरकारने किडनी खरेदी करून पेरणीसाठी पैसे देण्याची मागणीही या शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर मुंबई येथे जाऊन आंदोलन केले होते. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचे आदेश स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आंदोलन देखील झाले. मात्र त्याची दखल सरकारने घेतलीच नाही.
मागील चार दिवसांपासून ताकतोडा येथे सुरु असलेल्या उपोषणाची सरकारकडून तसेच प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याने संतप्त शेतकरी शांताराम सावके यांनी त्यांचे दुचाकी वाहन जाळून सरकारचा निषेध केला. यानंतरही सरकारने लक्ष न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.