लातूर : महाराष्ट्र व लातुरच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदनानिमित त्यांना अभिवादन करण्यासाठी गुरूवार 14 ऑगस्ट रोजी बाभळगावच्या विलासबागेत जनसागर लोटला.
मराठवाडयासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थाचे पदाधिकारी, देशमुख कुटंबीय तसेच मोठया जनसमुदायाच्या उपस्थितीत या लोकनेत्यास सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातूरसह राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विलासबाग येथे सकाळी नऊ वाजता गायिका वंदना कांबळे यांनी संतवाणीचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी विलासराव देशमुख यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विलासराव देशमुख यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि त्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या विचारांचे आणि लोकसेवेच्या कार्याचे स्मरण करून पुढील पिढीकडून लोकसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विलासबाग येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली विलासराव देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजीत देशमुख आणि डॉ. सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपआयुक्त पंजाबराव खानसुळे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव जवळगेकर, ॲड. किरण जाधव, लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांनीही पुष्पांजली अर्पण केली.