Provide assistance to farmers by immediately assessing the damage caused by hailstorm
लातूर, पुढारी वृत्तसेवा लातूर, धाराशिव जिल्ह्यांसह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आ पत्तीमुळे फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिके उद्ध्वस्त झाली असून, प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री तथा आ. अमित देशमुख यांनी केली आहे.
आ. अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता, ज्यातून रब्बी पिके कशीबशी वाचली होती. मात्र, काल १७ मार्च रोजी पुन्हा झालेल्या गारपिटीमुळे हाताशी आलेली पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांचा समावेश आहे. तसेच आंबा, द्राक्ष बागा आणि भाजीपाल्याचीही मोठी नासाडी झाली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाला तत्काळ पंचनाम्यांचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना ठोस दिलासा द्यावा.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०-२१ मार्चपर्यंत विदर्भआणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकरीवर्गामध्ये व्यापक जनजागृती करावी, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पूर्वतयारी करू शकतील, असेही आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाला सुचवले आहे.