लातूर, पुढारी वृतसेवा: नीट पेपर फुटी प्रकरणातील सध्या पोलिस कोठडीत असलेला लातूर जिल्ह्यातील कातपूर गावच्या शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखाँ पठाण याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी त्याच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी जलीलखाँ उमरखाँ पठाण पोलीस कोठडीत
जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्याकडून निलंबनाचे आदेश
अटक केलेल्या दिनांकापासून त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित
मुख्याध्यापकाच्या महत्वाच्या पदावर कार्यरत असताना आपल्या कर्तव्यात पठाण यांनी बेफिकिरी केली असून त्यांच्या या कृत्याने जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे. त्यांचे हे वर्तन महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील -३ नियमाचा भंग करणारे आहे.
त्यांच्या विरुध्द गुन्हाही नोंद झाला असून अटक केलेल्या दिनांकापासून त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे सागर यांनी निलंबन आदेशात म्हटले आहे. या आदेशाची नोंद जलीलखाँ उमरखाँ पठाण याच्या सेवापुस्तीकेतही घेण्याचे सागर यांनी संबंधितास निर्देशीत केले आहे.
48 तसापेक्षा अधिक काळ जर एखादी शासकीय पदावरील व्यक्ती तुरुंगात असेल, तर सेवा नियमाप्रमाणे तिला निलंबित करावे लागते. हा नियम पाहता सध्या पोलीस कोठडीत असलेला आरोपी संजय जाधव यालाही या कारवाईला सामोरे जावे लागेल.अॅड. उदय गवारे, लातूर