शेतकऱ्यांच्या बांधावर पोलिस; 663 शेतीविषयक वादांना सामोपचाराने न्याय pudhari photo
लातूर

Latur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोलिस; 663 शेतीविषयक वादांना सामोपचाराने न्याय

लातूर : पोलिस अन्‌‍ नागरिकांमधील विश्वासाचे नातेही होतेय मजबूत

पुढारी वृत्तसेवा

लातूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या थेट त्यांच्या बांधावर जाऊन ऐकून घेणे, शेतीविषयक तक्रारी व वादांचे तातडीने निवारण करणे आणि पोलिस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करणे या उद्देशाने लातूर जिल्हा पोलिस दलाने राबविलेला पोलिस शेतकऱ्याच्या बांधावर हा अभिनव उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून 16 मार्च ते 30 मे 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 663 शेती व जमिनीविषयक प्रकरणांचे यशस्वी निवारण करण्यात आले.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी शेतकऱ्यांना शेती रस्ते, बांधावरील वाद, पाणी वाटप, अतिक्रमण, मालकी हक्क, वहिवाट, पीक काढणी, जमिनीचे वाटप तसेच विविध कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समस्यांसाठी शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालये आणि पोलिस ठाण्यांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 1002 गावांना ग्रामभेटी देण्यात आल्या. प्रत्यक्ष संवादातून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी समुपदेशन व मध्यस्थीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना समजावून सांगत जागीच सामोपचाराने तोडगे काढण्यात आले.

मोहिमेत मालकी हक्क व वहिवाट संदर्भातील 119, बांधावरील वादांची 136, पाणी हक्क व वाटपाची 49, मोजणीची 50, जमिनीच्या वाटपाची 57, पीक काढणीची 10 तसेच इतर स्वरूपाची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे अनेक तंटे न्यायालयीन वादात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच मिटले.ग्रामीण भागातील तंटामुक्ती, संवाद आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी ‌‘पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर‌’ हा उपक्रम लातूर जिल्हा पोलिस दलाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श ठरत आहे.

शेतकरी हा समाज आणि अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या समस्या वेळेत सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. या उपक्रमातून केवळ तक्रारींचे निवारण झाले नाही, तर पोलिस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नातेही अधिक मजबूत झाले आहे.
अमोल तांबे, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT