Nilanga Udgir Monsoon Arrival Pudhari
लातूर

Latur Monsoon | निलंगा, उदगीरमध्ये मान्सूनची दमदार एंट्री; खरीप पेरणीला वेग येणार

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण शेतजमिनींना ओलावा,

पुढारी वृत्तसेवा

Nilanga Udgir Monsoon Arrival

निलंगा, उदगीर : जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निलंगा शहरासह तालुक्यातील विविध भागांत अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली. बुधवारी (दि. २४ जून) दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.

यंदा मृग नक्षत्र संपत आले तरी अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांबाबत शेतकरी चिंतेत होते. शेतीची मशागत पूर्ण करून अनेकांनी पावसाची वाट पाहत तयारी करून ठेवली होती. गतवर्षी कीर्तिका नक्षत्रातच पावसाने दमदार सुरुवात केल्याने संपूर्ण हंगामात चांगला पाऊस झाला आणि शेतीला मोठा फायदा झाला होता. मात्र यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे पेरण्यांचे नियोजन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.

दरम्यान, बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पावसाने जोरदार सुरुवात केली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले, तर शेतजमिनींना चांगला ओलावा मिळाला. पावसाच्या या सरींमुळे वातावरण प्रसन्न झाले असून उकाड्यापासूनही नागरिकांना दिलासा मिळाला.

जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या दमदार पावसामुळे निलंगा तालुक्यातील शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही मान्सूनची अशीच साथ लाभल्यास खरीप हंगाम समाधानकारक ठरेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

उदगीर तालुक्याच्या शेतशिवारात आनंदोत्सव

उदगीर : जून महिना संपत आला तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या उदगीर शहरासह तालुक्यात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी (दि. २४ जून) दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे आशेने नजर लावून बसलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर पावसाने हजेरी लावत सुखद दिलासा दिला. यंदा मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नियोजन रखडले होते. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवली होती.

मागील वर्षी कीर्तिका नक्षत्रातच मान्सून सक्रिय झाला होता. त्यानंतर चार महिने समाधानकारक पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली होती. मात्र यावर्षी मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आकाश काळवंडले आणि अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

दीड तासांहून अधिक काळ झालेल्या पावसामुळे उदगीर शहरातील काही सखल भागांत पाणी साचले. मात्र शेतशिवारांना पुरेसा ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या दमदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यापुढेही मान्सूनची अशीच साथ लाभल्यास सोयाबीन, तूर, मूग यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येईल आणि हंगाम समाधानकारक ठरेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाच्या आगमनाने शेतशिवारात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी हंगामाबाबत आशावाद वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT