लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पेरणीयोग्य पावसाने पाठ फिरवली असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७०६ मिमी असताना चालू हंगामात ६ जुलैपर्यंत केवळ ११७.२ मिमी म्हणजे वार्षिक सरासरीच्या १६.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. जूनमधील सर्वसाधारण १३५ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात ९५ मिमी पाऊस झाल्याने यंदाचा जून महिना सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. जिल्ह्यात केवळ १८.२६ टक्केच पेरणी झाली आहे. या विसंगत परिस्थितीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
सर्वसाधारणपणे जूनमध्ये पेरणी करण्याचा प्रघात जिल्ह्यात आहे. मृग नक्षत्रात पेरणी केल्यास धान्य चांगले उगवते, पिकाची वाढ चांगली होते, रोगप्रतिकारशक्ती पिकात येते व वेळोवेळी पावसाचा शिडकावा झाला की उत्पन्नही चांगले मिळते. मात्र या वर्षी मृग नक्षत्र पावसाची वाट पहाण्यातच संपून गेले. जिल्ह्यात केवळ आकाश ढगांनी गच्च होत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जळकोट तालुक्याचा ८० टक्के पेरणीचा अपवाद वगळता उर्वरित, तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत. जो काही थोडा थोडका पेरा झाला आहे तो जेमतेम ओलाव्यावर पुढे पाऊस पडेल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र वर्तमान परिस्थिती पहाता केलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता अधित दिसत आहे. उडीद-मुगाचा मोसम गेल्याने त्याचा पेरा होऊ शकरणार नाही. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५.८६ लाख हेक्टर आहे. सद्यस्थितीला एकूण क्षेत्रापैकी १८.२६% म्हणजेच सुमारे १.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ५.८६ हेक्टरपैकी ४ लाख
तुरीची पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात सध्या १२३ दिवस (सुमारे चार महिने) पुरेल इतका चारा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई भासू नये म्हणून प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. टंचाईग्रस्त भागात सध्या ३ टैंकर्स सुरू असून, १८७खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे; पेरणी रखडली
किनगाव, पुढारी वृत्तसेवा : किनगाव परिसरातील शेतकरी हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून सर्व शेतकरी बांधवांच्या नजरा या आभाळाकडे लागल्या आहेत. जून महिना संपला व जुलै महिना सुरू होऊन आठ दिवस उलटले तरी अजून मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. जून महिन्यात वेगवेगळ्या तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु जून महिनाही गेला. शेतकरी सांगत आहेत. रिमझिम पडलेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून काही शेतकऱ्यांची पावसामुळे पेरणी लांबली आहे. मागील वर्षी मान्सून पावसाने योग्यवेळी हजेरी लावल्यामुळे खरिपातील पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. या वेळी लवकरात लवकर वरुणराजाचे आगमन होणे आता गरजेचे झाले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगीतले जात आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात पेरण्या संथ शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा: शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र तालुक्यातील अनेक शिवारांमध्ये अद्याप पेरणी झालेली नसून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पूर्वमशागतीनंतर शेतात तयार झालेल्या मातीच्या ढेकळांनाही पुरेसा पाऊस न झाल्याने ते विरघळलेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. जोरदार आणि सलग पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे सुरक्षित राहील, असे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या पडणाऱ्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अपुरा ठरत आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा अद्याप अनेक शिवारांमध्ये निर्माण झालेला नाही. दरम्यान, हवामान अनुकूल होऊन लवकरच दमदार पाऊस होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. चांगला पाऊस झाल्यास उर्वरित शिवारांमध्येही पेरण्यांना वेग येऊन खरीप हंगामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्प तहानलेलेच
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये मिळून सध्या एकूण १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्पात १८ टक्के, तर निम्न तेरणा प्रकल्पात ३२.१६ टक्के पाणीसाठा आहे. तसेच मध्यम ८ प्रकल्पांमध्ये १२.२७ टक्के, १३५ लघुप्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.