Latur rainfall pudhari photo
लातूर

Latur rainfall : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चाकूर तालुक्यात पावसाची दमदार एंट्री

कोवळ्या पिकांना संजीवनी; ४० टक्के पेरण्याचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : तालुक्यातील विविध भागांत प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतशिवारातील कोवळ्या पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून ४० टक्के पेरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यंदा जुलै महिना सुरू होऊनही चाकूर तालुक्यातील बहुतांश पेरण्या खोळंबल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेने बळीराजावर चिंतेची गडद छाया निर्माण झाली असताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.

चाकूरसह परिसरातील शेतकरी पावसासाठी आभाळाकडे आस लावून बसला होता. यंदाचा खरीप हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला असून परिसरातील शेतकऱ्यांनी शेतजमिनीची नांगरणी, वखरणी, कोळपणी आणि पेरीणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी पूर्ण केली होती, मात्र पावसाने दीड महिन्यापासून दडी दिल्यामुळे शेतकरी हतबल झालेला पाहायला मिळाला.

काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी करून पावसाची आतुरतेने वाट पाहू लागला होता. सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. ओलाव्याचा अंदाज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली होती. मात्र, पेरलेले बियाणे काही ठिकाणी उमगले तर काही ठिकाणी उमगलेले कोवळी पिके पाण्यासाठी सुकू लागलेले चित्र तालुक्यात दिसून आले. यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवले होते.

निसर्गाच्या या लहरीपणामुळे दुबार पेरणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच पंढरपूरची यात्रा मागे फिरताच पाऊस पडेल, या आशेने शेतकरी प्रतीक्षा करू लागला आणि बुधवारी २९ जुलै रोजी रात्रपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसू लागले.

गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने उगवलेल्या कोवळ्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने पिके जगतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील उर्वरित ४० टक्के पेरण्या रानातील पाण्याचा ओघ आणि जमीन हडकल्यानंतर पेरणीचा मार्ग मोकळा होईल असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

चाकूर तालुक्यात पावसाच्या पाण्यावरच शेती अधिक अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना आता अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यस्थितीत पावसाच्या प्रतीक्षेने बळीराजा सुखावला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी तूर्तास आनंदी दिसत आहे.

  • उशिरा आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अजूनही अनेक भागातील नदी-नाले मात्र तहानलेले आहेत. पुढे चांगला पाऊस होण्याच्या शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT