

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी अद्याप एकदाही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी परिसरातील नदी, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या होत्या, परंतू गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना पाणी असून खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून मका, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला तसेच इतर खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दोन महिन्यांत एकही जोरदार पाऊस न पडल्याने अद्याप नदी, नाले, पाझर तलाव कोरडे असल्याने शेतकऱ्यापुढे सिंचनाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
विहिरीचे पाणी संपले असून अनेक ठिकाणी शेततळीदेखील कोरडी पडली होती.पेरणी केलेल्या मका, सोयाबीन, कापूस, तूर तसेच विविध भाजीपाला पिकांना रिमझिम पावसामुळे नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, तालुक्यातील या परिसरात मका, सोयाबीन, कापूस आणि तूर पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत.
रिमझिम पावसामुळे शेतशिवार हिरवेगार झाले असून, पिकांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. मात्र, केवळ हलक्या पावसावर हंगामाचा भार राहणार नसून जलसाठे भरण्यासाठी आणि पिकांना पुरेसा ओलावा मिळण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही समाधानकारक वाढलेली नाही. सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना तात्पुरता आधार मिळाला असला, तरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागली आहेत. तसेच विहिरीची पातळी वाढल्याने शेतातील विहिरींनी पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.