Body found in suitcase is that of a woman from Uttar Pradesh
लातूर, पुढारी वृत्तसेवा: चाकूर तालुक्यातील तिरू नदीच्या पुलाखाली आढळलेल्या एका ट्रॉली सुटकेसमधील महिलेच्या प्रेताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. मयत महिला उत्तर प्रदेशातील असून मारेकरी पती उदगीर येथील एका कारखान्यात मजूर पुरवठा करणारा मुकादम आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावल्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
शेळगाव शिवारातून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पुलाखाली २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्या एका तरुणास ट्रॉली सुटकेस निदर्शनास आली. त्यातून दुर्गंधी येत होती. याबाबत माहिती मिळताच वाढवणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन सुटकेस उघडून पाहिली असता त्यामध्ये एका महिलेचे प्रेत आढळून आले. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटविणे अवघड झाले. त्यावरून वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग, मयताने परिधान केलेली अंतर्वस्त्र, जर्किन, डाव्या पायातील काळा दोरा, हातातील पांढऱ्या रंगाची बांगडी, कानातील दागिने व शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ५ पथके गठीत करण्यात आली.
पथकाकडून उदगीर, अहमदपूर, चाकूर येथील एमआयडीसी तसेच साखर कारखान्यामध्ये, डाळ मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांची त्यांच्या कुटुंबीयांची गोपनीय पद्धतीने माहिती मिळविण्यात येत होती. दरम्यान एका साखर कारखान्यात मेन्टेनन्सचे काम करणाऱ्या कुटुंबीयांवर त्यांच्या हालचालीवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत होते. कुटुंबातील एक महिला काही दिवसांअगोदरच अचानक गायब झाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवून होते.
संशयित पतीने त्याचे बिंग फुटू नये म्हणून तो उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसींग दाखल करण्यासाठी आला असता पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी व सदर महिलेच्या फोटोची व नमूद गुन्ह्यातील रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलिस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने तो उत्तर प्रदेशमधील बडा सिक्किटा, जिल्हा कुशीनगर, उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगून नमूद गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून त्याचे नाव फरीदा खातून, वय २३ वर्ष असे असल्याचे सांगितले.
जिया ऊल हक यास त्याची पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होते. १५ ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना सज्जाद जरूल अन्सारी (१९ वर्ष), अरबाज जमलू अन्सारी (१९ वर्ष, सर्व रा. बडा सिक्किटा, जि. कुशीनगर, उ.प्र.), साकीर इब्राहिम अन्सारी (२४ वर्ष रा. विजयपूर, ता. तमकोइराज), आजम अली सजवाल अली ऊर्फ गुड्डू (१९ वर्ष रा. विजयपूर, ता. तमको-इराज) या साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोश्वास रोखून फरीदाचा खून केला व त्यानंतर फरीदाचा मृतदेह बॅगेत ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन फरिदाचा मृतदेह असलेली ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली. याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे तांबे यांनी सांगितले.