Uday Samant on kunbi certificates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली आहे. आतापर्यंत राज्य सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या कामांसाठी या बैठका होत्या. मराठवाड्यात २१ हजार ५१ जात प्रमाणपत्र दाखल्यांची पडताळणी केली, त्यातील १६ हजार ११० दिले आहेत. त्यामुळे पडताळणी चुकीची होतेय हा गैरसमज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी कुणीतरी जाणीवपूर्वक पसरवत आहे, असे स्पष्ट करत मराठा आरक्षणप्रश्नी संवाद गरजेचा आहे आणि आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये हे आम्ही संयमाने सांगतो, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, राज्यात कुणबी प्रमाणपत्रे फक्त २ हजार प्रलंबित आहेत, ती लवकरच मिळतील. याचा ओबीसी समाजावर काहीही परिणाम होणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे.
आम्ही कुणालाही दुजाभावाची वागणूक दिली नाही. सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत, अधिकारी काम करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आनंदी राहावे. त्यांचे अनेक समर्थक आहेत. त्यामुळे ज्या नेत्यांनी काम केले त्या नेत्यांबद्दल वाईट बोलले तर वाईट वाटते. जाणीवपूर्वक त्यांच्यात कुणीतरी गैरसमज पसरवतंय, असा दावाही उदय सामंत यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज झालेला नाही. मात्र त्यांना कुणीतरी काहीतरी सांगते, मग त्यांचा गैरसमज होतो. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी संवाद गरजेचा आहे. आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये हे आम्ही संयमाने सांगतोय, असा अप्रत्यक्ष इशाराही सामंत यांनी यावेळी दिला.
उद्या पोळा आहे. मराठवाड्यात यंदा दुष्काळ आहे. गणेशोत्सव आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे, अशी आम्ही विनंती करतो. ते आक्रमक आहेत तर आम्ही सरकार आहोत, मायबाप आहोत, संयम आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्हाला संयमानेच बोलावे लागेल. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवण्याचे आवाहन केले, आता ते आले नाहीत तर काय करावे? असा सवाल करत आम्ही ४ पावले नाही तर ५०० किमी पुढे आलोय, दंगल घडवणे हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही, हे पाप आम्ही करणार नाही, ते आमचे काम नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांची उपोषणामुळे चिडचिड होतेय, सरकार काळजी घेत आहे. तशी आंदोलकांनीही काळजी घ्यावी. जरांगे यांचे समर्थक आहेत तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहेत ना, तेही बोलणार ना. आमच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची चिडचिड होणार नाही का? त्यांच्याही भावना आहेत. हे सगळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे मंत्री झाले आहेत. मी मराठीचा (मराठी भाषेचा/मराठीचा) मंत्री असल्याने माझी त्यांना सांगण्याची भाषा सौम्य आहे, मात्र प्रत्येकाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, ते त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलू शकतात, असेही सामंत म्हणाले. दुष्काळाबाबत बैठकीत चर्चा झाली, परिस्थिती वेगळी होऊ शकते, त्यांनी सूचना केली, आम्ही सीएमना सांगणार आहोत. आता आम्ही इथेच थांबलो तर आम्हा दोघांना मतदारसंघ इथेच निवडावा लागेल, असा टोलाही सामंत यांनी लगावला.