Manoj Jarange Maratha Reservation Mumbai March: मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा निर्णायक वळण घेतले आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक सुरू असून, या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. “ही आपल्या हक्काची, अंतिम निर्णयाची आणि शेवटची लढाई आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही. मुंबईला जायचे फायनल झाले आहे,” अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटीत राज्यभरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा नेण्याचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले.
बैठकीत समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या निर्णायक टप्प्याची घोषणा केली. “ही आपल्या हक्काची लढाई आहे. ही अंतिम निर्णयाची आणि शेवटची लढाई आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा आता मुंबईकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जरांगे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेचेही लक्ष पुन्हा एकदा आंदोलनाकडे लागले आहे. मुंबईत आंदोलन पोहोचल्यास कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य भीतीच्या आधारावर नागरिकांचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने नोंदवले.
त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयानंतर जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता अंतरवाली सराटीतील राज्यव्यापी बैठकीत आंदोलनाचे नियोजन, मुंबईकडे कूच करण्याची तारीख आणि पुढील रणनीती याबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“मुंबईला जायचं फायनल झालंय,” या जरांगे पाटील यांच्या घोषणेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने पुन्हा एकदा आक्रमक व निर्णायक टप्प्यात प्रवेश केल्याचे चित्र आहे.