The Sant Muktabai Ringan ceremony was a truly fulfilling experience
जालना, पुढारी वृत्तसेवा : ३१८ वर्षांनंतर प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा रविवारी दि. ५) जालना शहरातील जेईएस मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती हा अभूतपूर्व भक्ती सोहळा भक्तिरसाने भारावून गेला.
पंढरपूर येथे जाणाऱ्या मानाच्या चार पालखी सोहळ्या पैकी सहा पालखींचा रिंगण सोहळा होतो. संत मुक्ताबाई यांच्या मानाच्या पालखी सोहळ्याचा आजपर्यंत रिंगण सोहळा झाला नव्हता. तो प्रथमच जालना शहरात रविवारी संपन्न झाला. यावेळी वारकरी व भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे रिंगण सोहळ्याने फेडले.
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या भेटीसाठी निघाला आहे. असुन लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकाराम असा गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला येतात. अनेक संतांच्या पालख्या विविध गावांतून पायी चालत पंढरपूरचा जातात. श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून खानदेश व विदर्भातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेली श्री संत मुक्ताबाईंची पालखी शनिवारी जालना शहरात दाखल झाली. शनिवारी शहरातील कन्हैया नगर येथे मुक्काम झाल्यानंतर पहाटे पालखी प्रस्थान केले. यंदा प्रथमच जालना शहरात ३१८ वर्षानंतर प्रथमच ऐतिहासिक रिंगण सोहळा आयोजन करण्यात आला होता. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी जेईएस मैदानावर गर्दी केली होती.
सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांनी पारंपरिक फुगड्या, अभंग, भजन आणि हरिनामाचा अखंड गजर करत परिसर दुमदुमून टाकला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी पाणी, अल्पोपहार तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती.
प्रशासनानेही वाहतूक, सुरक्षा आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या. हा दिमाखदार सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जालना शहर आणि जिल्ह्यातील भाविकांनी मैदानवर गर्दी केली होती. मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या मैदानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या पहिल्यांदाच रिंगणाचा अनुभव घेत-ल्यानंतर जालनाकरांनी मनोमनच हात जोडले, यावेळी महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक आणि बालवार-कऱ्यांचा उत्साह अधिक होता.
मान्यवरांनी खेळल्या फुगड्या
या रिंगंण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमास आ. अर्जुनराव खोतकर, खा. कल्याण काळे, आ. नारायण कुचे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजपा जालना शहर महापालीकेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्यासह मान्यवर नेते, उद्योजक, व्यापारी, वारकरी, नागरीक उपस्थित होते यावेळी आ. अर्जुनराव खोतकर व खा. कल्याण काळे, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, व महापालीका आयुक्त अंजली शर्मा यांनी फुगडी खेळली. आ. नारायण कुचे यांनी यावेळी रिंगण सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.