

'Ringan' ceremony in Jalna for the first time in 318 years
जालना, पुढारी वृत्तसेवा : मानाच्या सातव्या संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार, दि.५ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात रंगणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक ठरणारा श्री संत मुक्ताबाई पालखीचा भव्य रिंगण सोहळा यंदा प्रथमच जालना शहरात आयोजित करण्यात आला आहे. मागील ३१८ वर्षांच्या परंपरेत प्रथमच हा सोहळा सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जे.ई.एस. कॉलेज मैदानावर संपन्न होणार आहे.
त्यामुळे वारकरी संप्रदायातील मानाच्या सातव्या पालखीच्या रिंगण = सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची - सुवर्णसंधी जालनेकरांना मिळणार आहे. आतापर्यंत संत मुक्ताबाई पालखीचा अधिकृत रिंगण सोहळा कुठेही होत नव्हता. पालखी प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांच्या प्रेरणेने, वारकरी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मुळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली हा ऐतिहासिक उपक्रम साकारत आहे.
जिल्हाधिकारी, एसपींनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
या रिंगण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांतील वारकरी दिंड्यांसह सहभागी होणार असून टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय होणार आहे. दरम्यान, स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वॉटरप्रूफ टेंट, स्टेज, वीजपुरवठा आणि पालखी सुशोभिकरणासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे पोलिसांचाही चोख बंदोबस्त राहणार आहे. पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलिस अधीक्षक तेगबिर सिंग संधू यांनी आढावा घेतला.