The entire home of three brothers from the Andure family in the city was destroyed by fire
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या म्हाडा वसाहत भागात असलेल्या संत रोहिदास नगर येथील अंदुरे कुटुंबाच्या निवासस्थानाला अचानक भीषण आग लागली. या आगीत तीन भावांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घरातील दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम ही जळाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रुपचंद्र नारायण अंदुरे आणि त्यांचे तीन मुले संजय, राजू आणि गजानन हे सर्वजण एकाच ठिकाणी सलग जोडलेल्या पत्राच्या शेडमध्ये (एकलगट तीन पत्राच्या घरांमध्ये) एकत्र वस्ती करून राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी देखील घरातील सर्व कमावते पुरुष आणि महिला मजुरीच्या कामावर गेले होते. घरात केवळ लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती शेजारीपाजारी वावरत होत्या.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, घराच्या बाहेरील भिंतीवर व पत्राच्या खांबावर बसवण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या नवीन विद्युत मीटरमधून अचानक मोठा आवाज झाला. वीज प्रवाहातील बिघाडामुळे किंवा अंतर्गत तांत्रिक दोषामुळे या मीटरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, त्यातून निघालेल्या ठिणग्यांनी शेजारीच ठेवलेल्या सुक्या जनावरांच्या चाऱ्याला (कडबा आणि कुटार) तत्काळ कचाट्यात घेतले.
या आगीत लोखंडी कपाटात ठेवलेली तब्बल २ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम (कॅश) आगीत पूर्णपणे जळून कोळसा झाली आहे. यासोबतच घरातील महिलांचे सोन्या-चांदीचे दागिने देखील आगीच्या उष्णतेने वितळून आणि मातीत मिसळून नष्ट झाले आहेत. याशिवाय संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे स्थानिक तलाठी भाऊसाहेब सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी नागरिक उपस्थित होते.
स्थानिक तरुणांचे प्रयत्न
नागरिकांनी तातडीने भोकरदन नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले. या भागातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने आणि घरांची रचना एकमेकांना खेटून असल्याने सुरुवातीला पाण्याचा मारा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. परंतु, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक धाडसी तरुणांच्या मदतीने अत्यंत शिताफीने पाण्याचे पाईप्स छतावरून पुढे नेले आणि आगीवर पाण्याचा प्रचंड मारा सुरू केला. साधारणतः दीड ते दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.