The Class 12 result in the district is 86.17 percent.
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात बारावी परीक्षेचा निकाल ८६.१७ टक्के लागला आहे. बारावी परीक्षेत दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही मुलींनी निकालात बाजी मारल्याचे पहावयास मिळाले. जिल्ह्यात भोकरदन तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९४.४५ तर मंठा तालुक्याचा सर्वात कमी ५४.५८ टक्के एवढा लागला आहे. कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम मंठा तालुक्यातील निकालावर झाल्याची चर्चा आहे.
जालना जिल्ह्यात बारावी परी क्षेसाठी ३६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी ३६ हजार ५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी ३१ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८६. १७ टक्के एवढी आहे. जिल्ह्याच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. पास होण्यामधे मुलींची टक्केवारी ९०.८ तर मुलांची ८३.४१ टक्के आहे. बारावी परिक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागासह प्रशासनाने कंबर कसल्यामुळे मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल घसरल्याचे दिसून येत आहे.
मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी ५४.५८ टक्के एवढा लागला आहे. परतूरचा निकाल ६७.८१ टक्के लागला आहे. भोकरदन तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९४.४५ टक्के एवढा लागला असून यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जालना तालुक्याचा निकाल ८६.७९, बदनापूर ८५.५५, अंबड ८७.१४, घनसावंगी ८६.१७, जाफराबाद ८५.५८ टक्के एवढा लागला आहे.
निकालात सातत्याने घसरण
बारावी निकालात जालना जिल्ह्याची सातत्याने घसरण होताना दिसत आहे. २०२१ मधे जिल्ह्याचा निकाल ९८.९७ टक्के होता. त्यात गेल्या सहा वर्षांत सातत्याने घसरण होऊन तो ८६.१७ पर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात बारावी निकालातील घसरण हा चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे.
परीक्षेच्या काळात सहा गुन्हे
बारावी परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबाबत ६ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यात सहा शिक्षकांवरही गुन्हे दाखल आहेत. यावर्षी परिक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली होती.