The absence of rain in Ghansavangi has started having a serious impact on Kharif crops
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, कापूस, सोयाबीन, तूर यासह विविध पिके कोमेजून करपू लागली आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांनी स्वतः शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची अवस्था केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थिती समजून घेण्यावर कृषी विभागाने भर दिला.
दरम्यान, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पाहणी करताना पिकांची वाढ कोणत्या अवस्थेत आहे, पानांवर पाण्याच्या ताणाची लक्षणे आहेत का, जमिनीतील ओलावा किती आहे आणि पावसाचा खंड वाढल्यास पिकांवर कितपत परिणाम होऊ शकतो, याचा डॉ. पवळ यांनी आढावा घेतला. पाहणीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
पेरणीनंतर झालेला पाऊस, पिकांची सुरुवातीची वाढ, त्यानंतर पडलेला पावसाचा खंड आणि सध्याची परिस्थिती याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांनीही मोठ्या खर्चाने उभे केलेले पीक आता पाण्याअभावी कोमेजत असल्याने जीव जळत असल्याची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली.
शेतकऱ्यांनी पिकांसाठी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. उभ्या पिकाकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांची सारी गणिते बिघडली आहेत. दरम्यान, पावसाचा खंड वाढत असताना कृषी विभागाची प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणी शेतकऱ्यांसाठी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणणारी ठरत आहे.
शेतशिवाराची पाहणी केली असता जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या असून, पिकांची वाढ खुंटलेली व पाने कोमेजलेली दिसून आली. पावसाला आणखी विलंब झाल्यास पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करून उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करावा.डॉ. सखाराम पवळ, उपविभागीय कृषी अधिकारी