रावसाहेब अंभोरे
टेंभुर्णीः जुलमी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, कुंभारझरी, माहोरा, वरुड आदी भागांतील अनेक तरुणांनी मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला. हा संघर्ष कायम तेवत ठेवल्याने अखेर निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.
दरम्यान, १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, पण मराठवाडा अजूनही निजामाच्या अंधारात होता. रझाकारांच्या अत्याचाराने मराठवाडा होरपळत होता. अशा वेळी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने सशस्त्र लढा उभारला. वरुड येथील सिताराम मसाजी सातव आणि तुकाराम बाळाजी सातव यांनी जंगलात राहून या लढ्यात भाग घेतला होता.
धान्य लुटले जायचे, महिलांवर अत्याचार व्हायचा. या विरोधात भगवंतराव देशमुख, जयसिंग घायवट, शामराव कुलकर्णी आदींसह सातव घराण्यांनी या विरोधात बंड पुकारले होते. अखेर १३ सप्टेंबर १९४८ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी 'ऑपरेशन पोलो' हाती घेतले. ५ दिवसांत म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला.
याच काळात जाफराबाद तालुक्यातील नाक्याचे वरुड बु. येथील माळी समाजातील व मराठा समाजातील स्वातंत्र्यसैनिकांनी आपले मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळेच येथील हुतात्मा स्तंभ आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. येथील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे. म्हणून १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी दुसरा स्वातंत्र्य दिन आहे.
मराठवाड्याचा विकास अजून बाकी - निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला. निजाम गेला. आता आपण स्वतंत्र आहोत. परंतु, आजही मराठवाड्याच्या विकासाचा, सिंचनाचा अनुषेश भरला जात नाही. यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा आहे.पी. जी. तांबेकर, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक समिती टेंभुर्णी
नव्या पिढीला इतिहास कळावा- ज्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्यांचे स्मारक जर मोडकळीस येत असेल, तर आम्ही कसले मुक्त झालो? नव्या पिढीला इतिहास कळावा म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात वरुड बु. च्या या सहा हुतात्म्यांची कहाणी आली पाहिजे.रमेश सातव, वारस हुतात्मा परिवार, वरुड बु.