

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेत आतापर्यंत सुमारे २१०० लाभार्थ्यांनी घरासाठीची १० टक्के रक्कम जमा केली आहे. अर्जाची प्रक्रिया २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार असून, ३० सप्टेंबरनंतर अडीच लाख रुपयांच्या लाभाची संधी मिळणार नाही. ही माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी (दि. १६) पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेचे पाच प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांमधून एकूण ३४०८ घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पडेगाव येथील प्रकल्पात २१७ घरे असून, त्यापैकी ४१ घरांचे वाटप झाले आहे. तिसगाव प्रकल्पात ५९३, तर हसूल प्रकल्पात १९९ घरांचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ केवळ छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांपुरता मर्यादित नाही. ओपन फॉर स्टेट असल्याने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील पात्र नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
अर्जासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असून, ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा एकाच वेळी भरण्याची सक्ती नाही. एका महिन्यात दोन टप्प्यांत ही रक्कम जमा करता येणार आहे. त्यामुळे एकरकमी रक्कम भरणे शक्य नसलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अर्जाची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
दरम्यान, सप्टेंबरनंतर योजनेंतर्गत मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या लाभापासून पात्र नागरिकांना वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे इच्छुकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आयुक्त येडगे यांनी केले.
१० टक्के रक्कम दोन टप्प्यांत
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा एकरकमी भरावा लागणार नाही. एका महिन्यात दोन टप्प्यांत ही रक्कम जमा करता येईल. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अर्जाची प्रक्रिया २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून, ३० सप्टेंबरनंतर अडीच लाखांच्या लाभाची संधी राहणार नाही.