Supply water from the Khelna project to the command area in Bhokardan Taluka
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिके धोक्यात आली असून, अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी आव्हाना, ठालेवाडी, मालखेडा, सुभानपूरसह तालुक्यातील खेळणा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतीला तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश जाधव यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, भोकरदन तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद यांसह विविध खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपण्याच्या स्थितीत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पादनाच्या संकटासोबतच मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना तातडीचा आधार मिळावा यासाठी सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी केली.
एकरी ५० हजारांची मदत द्या
पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे व सर्वेक्षण करावे. भोकरदन तालुक्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.