Soybean crop along with cotton rotted
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात यावर्षी सततच्या अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशीसह सोयाबीन पिक पाण्यात असल्याने सडले आहे. तर काही ठिकाणी पिवळे पडले आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगले होईल या आशेने शेतीत चांगली मेहनत केली. मात्र या मेहनतीचे चीज होण्याऐवजी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
तालुक्यात ८९ हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक ४९ हजार हेक्टर कपाशी आणि २६ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली होती. तालुक्यातील आजपर्यंतची वार्षिक पावसाची सरा-सरी ६२८.५ मिमी इतकी असतांनाही ९८४.९ मिमी इतका पाऊस पडला आहे. सरासरी पेक्षा ३५६.४ मिमी जास्तीचा पाऊस पडल्याने पिके वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शासनाने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे दिवाळीचे नियोजन कपाशी तसेच सोयाबीन पिकावर अवलंबून असते. आणि या आलेल्या पैशावरच पीक कर्जाचे हते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील गरजा, दिवाळीच्या तयारीसाठी लागणारा पैसा हे सर्व कपाशी तसेच सोयाबीन विक्रीतूनच भागवले जात असे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यातील मुसळधार पावसाने पिके जमिनीत उभी असतानाच नष्ट झाली आहेत. कपाशी बोन्डे काळे आणि सडली आहेत. तर सोयाबीन पाने पिवळी पडून मुळांजवळून सडली आहेत.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून थातूरमातूर पंचनामे व चौकशीही केली जाते, मात्र त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या झालेल्या खर्चा इतपतही मदत मिळत नाही. दिवसरात्र शेतात मेहनत करूनही पिकं हातात येण्यापू र्वीच निसर्ग हिरावून घेतो. शेतात चौकशी करून अधिकारी जातात, मदतीचे पैसे मात्र वेळेवर कधीच येत नाहीत. उत्पन्न चांगले येईल या आशेवर शेतीवर खर्च केला, मात्र असमानी संकटाने तोंडचा घास गेला आहे, येणारी शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात जाईल, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांचे स्थलांतर
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ४ ते ५ वेळा अतिवृष्टी झाली आहे. २७ सप्टेंबर पासून पावसाने उघडीप देऊनही अजून शेतात वाफसा आलेली नाही. आणि त्यातच पुन्हा २८ तारखेला गोदावरी नदीला ३ लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने तालुक्यातील बानेगाव, सौंदलगांव, भोगगाव, शेवता, जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी, गुंज, शिवनगांव, भादली, मूरमा या गावांत महापूर आला होता. सुमारे ३ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.
भरपाई द्यावी तालुक्यातील बानेगावांत सततच्या पावसाने कपाशीचे पिक हाती येण्याच्या आधीच वाया गेले आहे. आणि राहिलेले सोयाबीन वेलो मोझंक रोगाने आक्रमण केल्याने समूळ नष्ट झाले आहे. आतापर्यंत या पिकावर हजारो रुपयांचा खर्च झाला. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी.शाम उढाण, बानेगाव
१२ एकरातील सोयाबीन पिक पूर्णपणे खराब झाले आहे. वैयक्तिक पीक विमा योजना पूर्वीप्रमाणे अस्तित्वात असती तर मी विमा कंपनीकडे दावा करून काही प्रमाणात तरी मदत मिळवू शकलो असतो. शासनाकडून आजवर कोणी पंचनामा करायला आलेले नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडलो आहोत.अशोक जाधव, खडका, घनसावंगी