Rise in Prices of Agricultural Inputs; Farmers Worried
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. खतांचे वाढलेले दर, डिझेलचा तुटवडा व महागाई तसेच बियाणे आणि औषधांच्या किमती वाढल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, पाइप तसेच इतर शेती उपयोगी साहित्य महाग झाल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी उधारीवर साहित्य खरेदी करत असून काहींना आर्थिक परिस्थितीमुळे पेरणीची तयारी करण्यातही अडचणी येत आहेत. तालुक्यात काही ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दुकानदारांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
वेळेत खते उपलब्ध न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. काही भागात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या चर्चानाही उधाण आले आहे. दरम्यान, डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पेरणी, फवारणी तसेच विहिरी किंवा बोअरद्वारे पाणी देण्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि निसर्गाच्या लहरी-पणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता महागाईचे नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने खतांच्या कमी किमत्तीसह पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, डिझेलच्या दरात दिलासा द्यावा तसेच शेती उपयोगी साहित्यावर अनुदान वाढवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
लोकप्रतिनिधींनी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. पेरणीपूर्वीच वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शेती व्यवसायात काही उरत नाही, त्यात आता खते, बियाणे, औषधा सगळाच महाग झाले आहे. पेरणी करायची म्हटल तर हातात पैसा नाही. शासनानं शेतकऱ्यांना मदत करून खतांचा पुरवठा वेळेत करायला पाहिजे."ज्ञानेश्वर पवार, शेतकरी, बोलेगाव