

बाळासाहेब पांडे
नायगाव : खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना नायगाव तालुक्यात डीएपी व युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांवर “खत उपलब्ध नाही” असे सांगितले जात असताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खताचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कृषी केंद्रांबाहेर शेतकऱ्यांच्या हेलपाटे मारून पाय दुखतअसून दिवसभर प्रतीक्षा करूनही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासन दराने खत मिळत नसल्याने काही विक्रेते जादा दराने खत विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी खतासोबत इतर औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा साहित्य घेण्याची सक्ती केली जात असल्याचाही आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, काही दुकानदारांकडे प्रत्यक्षात डीएपीचा साठा उपलब्ध असूनही “स्टॉक आलेला नाही”, “माल उतरलेला नाही” किंवा “खत संपले” अशी कारणे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे. अधिकारी चौकशी साठी आले की काही व्यापाऱ्यांनी खताचा साठा इतर गोदामे किंवा धान्य खरेदी दुकानांमध्ये हलवून कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचेही बोलले जात आहे.
कृषी विभागाच्या तपासणीत “सर्व्हर बंद”, “मशीन बंद”, “पावत्या तयार आहेत” खाजगी वही वर लिहून पान फाडून टाकणे दुसर तयार करणेअशी कारणे देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
खतांसाठी रांगा, नफेखोरांचा काळाबाजार तेजीत
नायगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया व डीएपी खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री तसेच इतर साहित्य घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कृषी विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दुकानदारांचे परवाने रद्द प्रक्रियेत; तडजोडीतून प्रकरण दडपल्याची चर्चा
नायगाव शहर हे कापड व कृषी बाजारपेठेचे प्रमुख केंद्र असल्याने येथे खत व कृषी साहित्याच्या काळाबाजाराच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी एका युवा कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीनंतर पाच मोठ्या कृषी दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र नंतर तडजोडी व आर्थिक व्यवहारातून हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा आजही दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी डीएपी खताचा साठा इतर दुकानांमध्ये व गोदामांमध्ये लपवून ठेवल्याचे आरोप झाले होते. तसेच तक्रारदार व संबंधित अधिकाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाल्याचीही चर्चा होती. सध्या पुन्हा एकदा याच प्रकरणाला उधाण आले असून एका नव्या तक्रारदाराने संबंधित प्रकरण हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे. “सामान्य शेतकऱ्याला खत नाही म्हणून हाकलायचे आणि प्रभावी तक्रारदार समोर आला तर आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटवायचे,” असा प्रकार सुरू असल्याची चर्चा शेतकरी, हमाल, मुनिम व छोट्या व्यापाऱ्यांमध्ये रंगत आहे.