Over two lakh farmers to get relief through loan waivers
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जालना जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभमिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेमुळे यापूर्वी विविध अटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात एकूण ४ लाख २९ हजार ४३१ शेतकरी असून, त्यांच्यावर ५ हजार ५२४ कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. यापैकी ३ लाख ५५ हजार ९६ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले असून २ लाख ४६ हजार ३५३ शेतकरी थकीत पीककर्जदार आहेत.
दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज असलेल्या सुमारे दोन लाख १० हजार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून, त्यासाठी अंदाजे २,१०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील थकीत कृषी कर्जामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुमारे २८,०५० शेतकऱ्यांचे २२९ कोटी रुपये, राष्ट्रीयीकृत बँकांकडे सुमारे १.५० लाख शेतकऱ्यांचे १,६१३ कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे ६६,२९० शेतकऱ्यांचे ५७९ कोटी रुपये, तर खासगी बँकांकडे सुमारे १,५०० शेतकऱ्यांचे २५ कोटी रुपये थकीत आहेत.
याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ₹५० हजार प्रोत्साहन अनुदानासाठी २०२६-२७ पर्यंतची अट रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील कृषी कर्जाचे चित्र
एकूण शेतकरी : ४,२९,४३१
एकूण कृषी कर्ज: ५,५२४ कोटी
पीककर्ज घेतलेले शेतकरी : ३,५५,०९६
थकीत पीककर्जदार : २,४६,३५३
कर्जमाफीचा संभाव्य लाभ: सुमारे २.१० लाख शेतकरी
संभाव्य कर्जमाफीची रक्कम : सुमारे २,१०० कोटी