Nine people were injured by a dog bite
आष्टी, पुढारी वृत्तसेवाः परतूर तालुक्यातील आष्टी येथे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, शनिवारी (ता. २९) व रविवारी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल नऊ जणांना चावा घेतला. यामुळे नागरीकांमधे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले असुन त्यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांलना पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आले आहे.
आष्टी परिसरात शनिवारी सकाळी एका भटक्या पिसाळलेल्या कुत्रीने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह दिसेल त्या व्यक्तीचा पाठलाग करून चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे.
या कुत्रीच्या हल्ल्यात जुगलकिशोर दाड (वय ६०), यासिन शेख (वय ६५), राजू कुरेशी (वय ३५, रा. वडवणी), अन्सार शेख (वय ३२, रा. आष्टी), ईश्वर देशमुख (वय ४८, रा. ब्राह्मणवाडी), पारुबाई चव्हाण (वय ७०, रा. कणकवाडी), शुभम लहाणे (वय १७, रा. सुरुमगाव) आणि निखिल फड (रा. आष्टी) हे जखमी झाले आहेत. या हल्ल्याचत जुगलकिशोर दाड, यासिन शेख आणि राजू कुरेशी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमींवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी उमेश साळवे यांनी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार करण्यात आल्याचे सांगितले. गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी ग्रा.प. कर्मचारी लिलाबाई उबाळे यांनाही कुत्र्याने चावा घेतला.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
आष्टी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, रस्ते, गल्लीबोळ तसेच वस्तीच्या परिसरात कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारी मुले, कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे.