

उदगीर : दिलेले पैसे परत न करणे आणि वेळोवेळी मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराला कंटाळून वायगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर ६०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३ (५) अन्वये दाखल करण्यात आला आहे. मयताचे नाव दयानंद बाबूराव हुले (वय ५० वर्षे, रा. वायगाव, ता. उदगीर, ह.मु. कृष्णा विहार, वृंदावन कॉलनी, लातूर) असे आहे. त्यांनी दि. २८/०८/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वायगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
या प्रकरणी मयताचा मुलगा आदित्य दयानंद हुले (वय २३ वर्षे, रा. वायगाव) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी आरोपींना वेळोवेळी उसने पैसे दिले होते. वारंवार पैसे परत मागूनही आरोपी पैसे परत देत नव्हते. उलट वडिलांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्रास देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी जीवन संपवले असून, जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी एका डायरीमध्ये सर्व आरोपींची नावे लिहून ठेवली आहेत. या प्रकरणी खालील ११ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
आसीफ काझी (रा. अपना बाजार, लातूर), किरण पायाळ (रा. लातूर), निखिल जांभळे (रा. वायगाव, ता. उदगीर) लोंढे सर (पूर्ण माहिती नाही), घनश्याम मोरे (रा. वायगाव, ता. उदगीर), मीना सर (रा. उदगीर), विनय जाकते (पूर्ण माहिती नाही), हरिभाऊ भगत (रा. लातूर) गणेश हॉटेलचे मालक (रा. लातूर; केंद्रे इंजिनियर, रा. लातूर), आणि रहीम भाई (रा. लातूर). सदर घटनेबाबत सुरुवातीला पोलीस ठाण्यात अकस्मात मयत क्रमांक ७३/२०२६ अशी नोंद करण्यात आली होती. आज दि. ३१/०८/२०२६ रोजी फिर्यादीने पोलीस ठाण्यात हजर येऊन सविस्तर जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेबंडे हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक डी. डी. गाडे यांनी भेट दिली आहे. या घटनेमुळे वायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.