Mobile phones have taken the place of outdoor games.
अविनाश घोगरे
घनसावंगी : उन्हाळी सुट्टी म्हटली की, गावातील वडाच्या झाडाखाली रंगणाऱ्या सूरपारंब्या, मैदानात चालणारा विटी-दांडू, गोट्यांचा डाव आणि कबड्डी-खो-खोचा जल्लोष हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागात सहज पाहायला मिळत होते. मात्र बदलत्या काळानुसार हे पारंपरिक खेळ आता काळाच्या पडद्याआड जात असून त्यांच्या जागी मोबाईल आणि ऑनलाईन गेमने स्थान मिळविल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागातही दिसून येत आहे.
सूरपारंब्या हा ग्रामीण भागातील अत्यंत लोकप्रिय आणि धाडसी खेळ मानला जात होता. गावातील मोठ्या वडाच्या झाडावर हा खेळ रंगत असे. लहान मुले वडाच्या पारंब्यांना धरून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असत. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर घेतलेल्या उडीला 'सूर' म्हटले जात असे. वडाच्या 'पारंब्यांचा' वापर होत असल्याने या खेळाला 'सूरपारंब्या' असे नाव पडले. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारच्या वेळी गावातील मुले झाडाखाली जमून तासन्तास हा खेळ खेळत असत.
त्याचप्रमाणे विटी-दांडू, गोट्या, लगोरी, लपाछपी, कबड्डी यांसारख्या खेळांमुळे गावातील वातावरण उत्साही बनत होते. या खेळांमधून मुलांचा शारीरिक व्यायाम होत होता, तसेच मैत्री, संघभावना आणि धैर्याची जाणीवही निर्माण होत होती.
मात्र गेल्या काही वर्षांत मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन गेमचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुलांचा ओढा मैदानी खेळांपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सायंकाळ होताच गावातील रस्ते आणि मैदाने मुलांच्या गोंधळाने भरून जात असत. आता मात्र अनेक मुले घरात बसून मोबाईलवर गेम खेळताना किंवा व्हिडीओ पाहताना दिसतात. ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले असून गावातील मैदानेही ओस पडत आहे.
मैदानी खेळाची गरज
पारंपरिक खेळ हे ग्रामीण संस्कृतीचे जिवंत प्रतीक होते. या खेळांमधून मुलांमध्ये शिस्त, जिद्द आणि सामाजिक जाणीव विकसित होत होती. त्यामुळे पालक, शाळा आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन मुलांना पुन्हा मैदानी खेळांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत आहे. उन्हाळी सुट्टीत पुन्हा एकदा गावातील वडाच्या झाडाखाली सूरपारंब्यांचा खेळ रंगावा आणि मैदानात विटी-दांडूचा जल्लोष अनुभवायला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.