आन्वा ः भोकरदन तालुक्यातील आन्वा - भोकरदन मुख्य रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे, रस्त्यावर दोन दोन फुटाचे मोठेमोठे खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन मोठ्याने आदळत आहे. त्यामुळे अपघात देखील झाले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनधारक ये-जा करतात. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाट लागली असून रस्त्यावरील खड्ड्याची डागड्डजी करून खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी होत आहेत.
या रस्त्यावर खड्ड्यामुळे आतापर्यंत काही छोटे-मोठे अपघात झाले असून, गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भोकरदन व सिल्लोड तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या वाकडी आसडी आव्हाणा मार्गाचे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते चार वर्षांपासून रखडल्याने अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक वैतागले आहेत.
ग्रामीण भागातील विकास साधण्याच्या दृष्टिने रस्त्यांचे महत्त्व ओळखून केंद्र सरकारच्या वतीने वर्ष 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्रीय ग्रामसडक मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील दुर्गम भागात असलेली गावे, पक्के रस्ते उभारुन मोठ्या गावांना व शहरांना जोडण्यात येत आहेत. या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
रस्त्याची झाली चाळणी
गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आला नसल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.